Saturday, December 24, 2016

Shriguru Balaji Tambe

ध्यानी-मनी नित्‍य श्री दत्त हेचिं नाम


श्री सद्‌गुरू दत्तात्रेय यांचे नित्य ध्यान करायचे, तर ध्यानप्रतिमाही योग्यच हवी. त्या ध्यानाने भक्तांना लाभ मिळायला हवा. ही योग्य ध्यानप्रतिमा कोणती? दत्तजयंतीनिमित्त याविषयीची चर्चा  
श्रीदत्तात्रेय हे गुरूंचे सद्‌गुरू, परमगुरू आहेत. योगेश्वर आहेत. श्रीदत्तगुरूंचे बंधू आहेत चंद्रमा. म्हणजे श्रीदत्तगुरू यांचा जन्म कोणत्या युगात झाला असेल याचा तुम्ही अंदाज बांधू शकता. ही सृष्टी त्रिगुणात्मक आहे. तीन भाव, तीन देवता आहेत. या सृष्टीचे एक सरळ सूत्र आहे. पहिल्यांदा कोणत्याही गोष्टीची निर्मिती होते. ही निर्मिती करतात ब्रह्मदेव. कोणतीही संकल्पना आपल्या मेंदूत तयार होते आणि तेथेच त्याचे सृजन होते. या सृजनाची देवता आहे ब्रह्मा. आपल्या शरीरातील मेंदू हा या सृजनव्यवहाराच्या केंद्रस्थानी असतो. ब्रह्माचे ते स्थान. जीवन हे नेहमी वर्तमानकाळात चालते आणि त्याची देवता आहे विष्णू. मेरूदंड हे विष्णूचे स्थान. पूर्ण चलनवलन व्यवस्था तेथून चालते. सर्व प्रकारचे चलनवलन हे विष्णूदेवांच्या नियंत्रणात चालते. एकदा प्रवास सुरू झाला की कुठेतरी पोचायचे असते. मनुष्याला मोक्षप्राप्ती करायची असते. त्यासाठी हे शरीर सोडावे लागतेच. या जीवनाला उत्क्रांत करीत सूक्ष्म रूपात पुढे जायचे असते. हे कार्य करणारी देवता आहे शिव. उत्पत्ती-स्थिती-लय ही जीवनाची तीन अंगे आहेत. ब्रह्मा-विष्णू-महेश या त्यांच्या देवता आहेत. तशीच तीन शास्त्रेही आहेत. वेद म्हणजे विश्वाचे ज्ञान, आयुर्वेद म्हणजे आरोग्याचे ज्ञान आहे. म्हणजेच या शरीराच्या व निसर्गाच्या असलेल्या संबंधाचे ज्ञान आहे. तिसरे आहे वैराग्य. राग म्हणजे इच्छा. सर्व इच्छा-आकांक्षांच्या पूर्तीनंतर आता सर्व इच्छा-आकांक्षांच्या पार गेल्यावर येते ते वैराग्य. येथेही ब्रह्मा-विष्णू-महेश आहेत. विश्वाचे ज्ञान झाले की मनुष्य दान देतो. आरोग्याचे ज्ञान झाले की आपल्या शरीराची तो काळजी घेऊ शकतो. जो योगाचा अभ्यास करील त्याला योगेश्वर शिव प्रसन्न होतील. मुक्तीचे रूप दाखवतील. ही तीन वेगवेगळी रूपे आहेत. त्या तिघांनाही एकत्र असे आपल्याला पाहायचेय. आपल्यात एकत्र आणायचेय. ते कार्य करतात त्रिगुणरूप श्रीदत्तात्रेय. अनसूया-अत्रिनंदन श्रीदत्तात्रेय हे सर्व मानवजातीला कलियुगात तारणारे असे एकमेव सद्‌गुरू. ज्ञानदानाची परंपरा ज्या सद्‌गुरूंनी आपल्या सर्व अंशात्मक गुरूंमार्फत चालविली ते हे श्री सद्‌गुरू दत्तात्रेय. यांच्या ध्यानाचे दोन श्‍लोक अधिक प्रचलित आहेत. पहिला श्‍लोक आहे,
मालाकमण्डलुरधः करपद्मयुग्मे
मध्यस्थपाणियुगुले डमरूत्रिशूले ।
यस्य स्त ऊर्ध्वकरयोः शुभशंखचक्रे 
वन्दे तमत्रिवरदं भुजषट्‌कयुक्‍तम्‌ ।।
डोळे मिटल्यानंतर श्री सद्‌गुरूंचे ध्यान डोळ्यांसमोर यावे म्हणून काही व्यक्‍तींना समोर चित्रे किंवा मूर्तीची आवश्‍यकता असते. श्री दत्तात्रेयांची अनेक चित्रे उपलब्ध आहेत. माझ्या मते, देवाला शरीररूपाने चित्रात दाखवायचे असले तर ते चित्र शरीरशास्त्राप्रमाणे सुदृढ, संतुलित शरीराची जी काही मापे ठरलेली आहेत त्यानुसार असावे. तसेच कुठल्याही देवतेचे ध्यान करत असताना त्यांची अनुकंपा, कृपा व दया आपल्याला लाभते आहे असा भाव त्यांच्याही चेहऱ्यावर असावा आणि देवतेच्या त्या चित्राकडे प्रेमाने व अत्यंत आदराने पाहून ध्यान करता यावे. श्री दत्तात्रेयांच्या चित्रात कधी मधल्या किंवा कधी बाजूच्या एका डोक्‍यावरून गंगा वाहत असते. मध्यभागी असलेली देवता कधी विष्णू, कधी ब्रह्मा तर कधी शंकर असते. पण ‘मालाकमण्डलुरधः करपद्मयुग्मे’ या उक्‍तीनुसार विचार करता माला व कमंडलू ही साधने दत्तात्रेयांनी खालच्या हातात धारण केलेली आहेत. ही दोन्ही साधने श्री ब्रह्मदेवांची असल्यामुळे मध्यभागी श्री ब्रह्मदेवांचे शिर असावे लागेल. त्यानंतर एका बाजूला शंकर व एका बाजूला विष्णू अशाप्रकारे देवता दाखवाव्या लागतील. चित्र पाहणाऱ्याच्या उजव्या हाताला श्री शंकर व डाव्या हाताला श्री विष्णू देवता आहेत असे धरले व त्यांचे हात व्यवस्थित दाखवले तर ‘मध्यस्थपाणियुगुले डमरूत्रिशूले’ या उक्‍तीनुसार मधल्या हातांमध्ये शंकरांचे डमरू व त्रिशूल दाखवता येतात व वरच्या दोन हातांमध्ये शंख व चक्र दाखविता येतात. अशाप्रकारे ध्यान असणारे चित्र उत्तम व योग्य असते असे वाटते व तशाप्रकारे ध्यान करणाऱ्यांचे अनुभव खूप चांगलेही आहेत. श्री दत्तगुरूंची मूर्ती किंवा चित्र हवे असले की आपण सहसा तीन शिरे असलेली कुठलीही मूर्ती किंवा चित्र फ्रेम करून आणतो, परंतु प्रत्येक देवतेच्या स्वरूपाचा विचार करणे आवश्‍यक आहे. देवतेविषयी विकार उत्पन्न होईल असा आकार किंवा भाव चित्रामध्ये किंवा मूर्तीमध्ये कदापि नसावा. श्री दत्तात्रेयांच्या ठिकाणी असणारे प्रेम व्यक्‍त व्हावे म्हणून आणि सद्‌गुरू ही तिन्ही देवतांच्या वर असणारी शक्‍ती आहे यासाठी कलियुगात त्यांची उपासना केली असता, ‘स्मर्तृगामी स माऽवतु’नुसार म्हणजे आठवण केल्याक्षणी सद्‌गुरू आपल्याला मदत करणार असतील, तर त्यांचे ध्यान करता यायला हवे. श्री दत्तात्रेयांच्या ध्यानाचा दुसरा एक श्‍लोकही प्रसिद्ध आहे.
काषायवस्त्रं करदण्डधारिणं 
कमण्डलुं पद्मकरेण शंखम्‌ ।
चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं 
श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ।।
या ठिकाणी कमंडलू व पद्म श्री ब्रह्मदेवांचे, दंड / त्रिशूल व गदा ही श्री शंकरांची (यातील गदा शिव-अंश असलेल्या श्री मारुतीरायांजवळ पाहायला मिळते) आणि शंख व चक्र श्री विष्णूंची आहे. हे ध्यान श्री विष्णूप्रधान (मध्ये विष्णू असलेले) आहे. कारण गदा व दंड बाजूने हातात धरले तरी ते चित्र संतुलित असू शकते. मुख्य म्हणजे श्री दत्तात्रेय ही देवता तीन शिरे असलेली आहे व खाली शरीर मात्र एकच आहे. शरीर एक आहे, पाय दोन आहेत तरी हात मात्र सहा आहेत. शरीराची अशा तऱ्हेची रचना चित्रात दाखविता येणे खूप अवघड आहे. प्रत्येक देवतेच्या दोन मुख्य कार्यशक्‍ती चित्रात समाविष्ट करण्यासाठी सहा हात दाखविले आहेत. मात्र, शक्‍तिपाताचार्य योगिराज गुळवणी महाराजांनी एकमुखी दत्ताचे चित्र काढून त्याचा प्रसार केला. अर्थात, श्री दत्तात्रेयांचे कुठलेही चित्र पाहताना बाजूची दोन शिरे पाहण्यापूर्वी प्रथम लक्ष मधल्या शिराकडेच जाते. श्री दत्तात्रेयांची मूर्ती किंवा चित्र पाहात असताना त्यांचे सहाही डोळे दिसणे अपेक्षित असते, केवळ दोन वा चार डोळे दिसणे तितकेसे बरोबर नाही. तेव्हा श्री दत्तात्रेयांची शिरे अशा तऱ्हेने दाखविली पाहिजेत की तिन्ही देवतांचे डोळे पूर्णपणे दिसावेत. असे असले तरच चित्र किंवा मूर्ती पूर्णांशाने बरोबर असेल. यामध्ये कुठल्याही प्रकारे भगवान श्री सद्‌गुरू दत्तात्रेयांविषयी गैरसमज होऊ नये, परंतु सर्व भक्‍तांना लाभ मिळावा, या दृष्टीने लेखनाचा हा प्रपंच केलेला आहे.
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.

श्रीगुरू बालाजी तांबे यांनी केलेले हे निरूपण पाहा
Datta Jayanti, maharashtra, shriguru balaji tambe
datta jayanti

No comments: