Saturday, December 24, 2016

7 Shlok Geeta in Marathi - Balaji Tambe

भगवान श्रीकृष्णांनी कुरूक्षेत्रावर वीर अर्जुनाला उपदेश केला. त्याला पडलेले संभ्रम दूर केले. "रात्रंदिन आम्हा युद्धाचे प्रसंग' असताना आपल्यालाही ही गीता संभ्रमातून बाहेर काढते. श्रीमद्‌भगवद्‌गीतेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर आपल्याला मागदर्शन मिळते. शनिवारी (ता. 10 डिसेंबर) श्रीमद्‌भगवद्‌गीता जयंती आहे. त्यानिमित्त हे विशेष निरूपण -
कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर कौरव-पांडवांची सैन्ये उभी आहेत. प्रत्यक्ष भगवंत उपदेश करत आहेत. हे युद्ध म्हणजे काहीच नाही. जीवनात अशी अनेक संकटे येतात, ज्यांच्यात जडलेली अस्त्रे-शस्त्रे आपल्याला दिसू शकत नाहीत. आपलेच नातेवाईक आपल्यासमोर युद्धासाठी उभे ठाकतात. दोन भावांमध्ये जमिनीची वाटणी झाल्यावर एका भावाकडे सहा इंच जमिनीचा पट्टा कमी आला, एवढ्यावरून तंटे होताना दिसतात. युद्ध काही काळ चालते, पण नंतर जीवन चालूच असते.
कुरूक्षेत्रावर दिसणारे युद्ध तात्कालिक आहे, हे एक रूपक आहे. प्रत्यक्षात प्रत्येकाला आपल्या स्वतःशीच युद्ध करायचे आहे. मनुष्याला युद्ध करायचे आहे व्यसनांशी, कुविचारांशी, त्याच्या आत असलेल्या राक्षसत्वाशी. शांती कशी मिळेल यासाठी भगवंतांनी श्रीमद्‌भगवद्‌गीतेत सविस्तर उपदेश केला आहे. श्रीमद्‌भगवद्‌गीता युद्धभूमीवर सांगितली गेली. युद्धभूमीवर आत्मा व मन सचेतन होते, सर्व इंद्रिये सावध होतात. येथे झालेली छोटीशी चूक मनुष्याला सरळ वरचा रस्ता दाखवते. युद्धभूमीवर एखाद्याच्या कानावर समजा शब्द आले, "अरे, तुझ्याकडे अस्त्र येत आहे, खाली बैस', तर हा संदेश अत्यंत सावधानतेने ऐकला जातो, ती व्यक्‍ती विनाविलंब खाली झुकते व बाण सूऽऽ सूऽऽ करत पलीकडे निघून जातो. तेव्हा युद्धभूमीवर सावधान असणे, साक्षीत्वता असणे खूपच आवश्‍यक असते. येथे तर प्रत्यक्ष भगवंत सांगत आहेत व भगवंत जे सांगत आहेत ते आपल्याला ऐकायचे आहे. "या स्वयं पद्मनाभस्य' म्हणजे प्रत्यक्ष भगवंत येथे उपदेश करत आहेत. सध्या आपल्याला अनेक वेगवेगळ्या मार्गांनी वेगवेगळे सल्ले मिळत असतात. "मित्र जोडण्यासाठी काय उपाय करावेत', वगैरे विषयांवरही आज पुस्तके उपलब्ध असतात. मित्र तर आपला जिवलग सखा असतो. तो आपलाच एक भाग असल्यासारखा असतो. मित्र-मित्र, पती-पत्नी यांच्यात एकमेकांना जिंकायची, एकमेकांवर कुरघोडी करायची भावना कदापि नसावी. त्यांच्यात एकमेकांना जिंकण्याची भावना आली तर या नात्यांनाच सुरुंग लागतो. मैत्री, प्रेम हे जन्मतःच असलेले आकर्षण असते, फक्‍त ते वाढवायचे असते.
आपल्याला जायचे आहे भगवंतांपर्यंत. आपल्याला शांतीचा अनुभव घ्यायचा आहे, परमचैतन्याचा अनुभव घ्यायचा आहे. भगवंतांपर्यंत पोचण्याच्या मार्गात जे काही येईल त्याच्याशी आपल्याला लढायचे आहे. याचे मार्गदर्शन आपल्याला श्रीमद्‌भगवद्‌गीतेत मिळते. श्रीमद्‌भगवद्‌गीता वाचायला, तिचा अभ्यास करायला, ती आचरणात आणायला जात-पात, धर्म, देश, काळ असे कशाचाही बंधन नाही. श्रीमद्‌भगवद्‌गीता म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांचा मनुष्याशी असलेला संवाद आहे. श्रीमद्‌भगवद्‌गीता हा केवळ हिंदूंचा धर्मग्रंथ नाही, तो एक जीवनशास्त्रीय ग्रंथ आहे, एक मानवता गीत आहे. श्रीमद्‌भगवद्‌गीतेचा आमच्याशी काय संबंध असे म्हणून या मानवता गीताकडे कानाडोळा केला तर प्रत्यक्ष परमपुरुष परमात्म्याने केलेली चर्चा ऐकण्याच्या संधीला मुकावे लागेल. संसारात राहून, सामान्य जीवन जगत असताना, आपल्या मुलाबाळांसह कुटुंबात राहून आध्यात्मिक साधना कशी करावी व शांतीचा अनुभव कसा घ्यावा याचे मार्गदर्शन श्रीमद्‌भगवद्‌गीतेत केलेले आहे. शांतीचा अनुभव घेण्यासाठी हिमालयाच्या गुहेतच जायला पाहिजे असे नाही, तर शांती आपल्यातच असते. आपण शांत झालो की जगातील कुठलाही कोलाहल आपल्याला त्रास देऊ शकत नाही. सारांश असा, की भगवंतांच्या चरणांपाशी जायचे आहे, शांतीचा अनुभव घ्यायचा आहे, आनंदाच्या डोहात आनंदाने पोहायचे आहे, आनंदाचा अनुभव घ्यायचा आहे. इतरांना मदत करत आयुष्यक्रमण करताना जीर्ण झालेले शरीर एक दिवशी सोडावे लागतेच. शरीर सोडताना भावना अशी असते की, मी हे शरीर सोडत आहे; पण दुसरे नवे शरीर घेऊन पुन्हा इतरांच्या मदतीला येईन.
सप्तश्‍लोकी गीता म्हणजे जणू गीतेच्या सातशे श्‍लोकांचा सारांशच आहे.
तसे पाहता, श्रीमद्‌भगवद्‌गीतेचे प्रत्येक अक्षरच जाणून घेण्यासारखे आहे. सप्तश्‍लोकी गीतेतील पहिला श्‍लोक आहे,
1) ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्‌ माम्‌ अनुस्मरन्‌ ।
यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम्‌ ।।8-13।।

(जो कोणी ॐ या एकाक्षर ब्रह्माचे उच्चारण करत, माझे चिंतन करत, देह सोडून जातो तो पुरुष परम गतीला प्राप्त होतो.)
या श्‍लोकाआधी त्याच्या जोडीचा श्‍लोक आहे,
सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च ।
मूर्ध्न्याधायात्मनः प्राणम्‌ आस्थितो योगधारणाम्‌ ।।8-12।।

(सर्व इंद्रियांच्या द्वारांना आवरून, अर्थात इंद्रियांचा विषयांपासून निरोध करून, मनाला हृदयात स्थिर करून, आपल्या प्राणाला मस्तकात स्थापन करून व योगधारणेत स्थित होऊन)
हे दोन श्‍लोक वाचताना डोळ्यांत अश्रू येतात. माझे काय भाग्य असावे की प्रत्यक्ष भगवंतांनी कृपा करून मला या दोन श्‍लोकांचा दृष्टांत दिला होता. 1965-66 चा प्रसंग आहे. एकदा मी पाचगणी येथे बसलो होतो. गीतेचा अभ्यास चालू होता. इंद्रियांना ताब्यात आणण्याचा प्रयत्न होता. मनाला हृदयात (जे भगवंतांचे स्थान आहे.) आणून दारावर टिकटिक करण्याचा प्रयत्न सुरू होता, इच्छा होती, "हे भगवंता, एकदा तरी दर्शन द्या'. एकदम या दोन श्‍लोकांचा दृष्टांत झाला. भगवंतांनी सांगितले, ""मरण्याची आवश्‍यकता नाही. आपल्या स्थूल शरीराचा भाव सोडून द्या. हा भाव सुटला तर सूक्ष्म शरीर स्थूल शरीरापासून सुटे होईल व त्याला परमगती प्राप्त होईल.'' यासाठी मरून देह सोडण्याची गरज नसून, ॐकार उपासनेची गरज आहे.
भगवंतांना स्मरावे, त्यांच्या परमशक्‍तीचे, त्यांच्या स्पंदनांचे स्मरण करावे, ॐकाराची उपासना करत त्यांच्याशी एक होऊन जावे. असेही ॐकाराच्या उपासनेत स्थूल शरीरापासून सूक्ष्म शरीर सुटे होणे शक्‍य असते. "सोम' साधनेतही हाच फायदा मिळतो. यामुळे साधकाची सर्जनशक्‍ती वाढते, झोपेत फरक पडतो, परमशक्‍तीचे मार्गदर्शन मिळते. शांत झोप आल्यामुळे दिवसही शांततेत जातो.
जीवनभरात ॐ उच्चारलेला नसला, तर मृत्यू येत असताना शेवटच्या क्षणी ॐ कसा आठवेल? आठवला तरी एकदा ॐ आठवल्याने परमगती कशी काय मिळेल? तेव्हा "त्यजन्‌ देहं' याचा अर्थ "मृत्यूनंतर' असा नाही, हे नक्की. भगवंतांनी गीतेकडे, या दोन श्‍लोकांकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी दिली.
2) अर्जुन उवाच
स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या
जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च ।
रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति
सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघाः ।।11-36।।

(हे हृषीकेशा, हे योग्यच आहे की, आपल्या नावाच्या व प्रभावाच्या कीर्तनाने जग अतिशय हर्षित होते व अनुरक्‍तही होते. तसेच भयभीत झालेले राक्षस लोक दशदिशांकडे पळून जातात आणि सर्व सिद्धगणांचे समुदाय नमस्कार करतात.)
हा श्‍लोक सप्तश्‍लोकी गीतेत का अंतर्भूत असावा?
प्रभाव दोन प्रकारचा असतो. सृष्टीचे निर्माणकर्ता, परमपुरुष, भगवंतांचा निर्देश आपण "तत्‌' या शब्दाने करतो. भगवान म्हणजे कोणी पुरुष वा स्त्री नाही, ते एक पूर्ण आहेत. भगवंत ही एक संकल्पना आहे. एक प्रोग्रॅम आहे. भगवंतांच्या ठायी स्फुल्लिंग आहे, स्फुरण आहे. म्हणजे त्यांच्यापासून स्पंदन निघते. गाडीत भरलेले पेट्रोल विशिष्ट ठिकाणी आले की त्यात स्पार्क पडतो. त्यातून शक्‍ती तयार होते व गाडी सुरू होते. पेसमेकर मनुष्याच्या हृदयाला एक स्पंदन, ठिणगी (स्पार्क) देतो. पेसमेकरने हृदयाला स्पार्क दिला की हृदयाचे आकुंचन प्रसरण होते, इतकेच नाही तर यामुळेच ओजही सर्व शरीरभर पोचायला मदत होते. भगवंतांच्यातून निर्माण झालेले स्पंदन विश्वात सर्वदूर पोचते, यामुळेच सर्व विश्वाचे व्यवहार सुरू राहू शकतात. तेव्हा हे स्पंदन किती शक्‍तिशाली असावे, याची आपल्याला कल्पना येऊ शकते. सर्व विश्व ज्यामुळे चालते ते स्पंदन किती मोठे असावे व असे स्पंदन ज्यांच्यातून निर्माण होते त्यांची शक्‍ती किती असावी? अशा महान शक्‍तीच्या अस्तित्वाच्या नुसत्या कल्पनेनेही आनंद मिळतो. बागेत बी पेरले, तर त्याला अंकुर येतो, त्याला दोन पाने फुटतात, रोप वाढायला लागते. हे सर्व पाहणाऱ्याला आनंद होतो, मन प्रसन्न होते. हे सर्व ज्या भगवंतांच्या संकल्पनेच्या जोरावर चालत असते, त्या भगवंतांचे सुंदर, रमणीय रूप पाहिले तर मन प्रसन्न होते. "स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या' म्हणजे आपल्या प्रभावामुळे सर्व जग हर्षित होते. परमेश्वर हे शांतिस्वरूप आहेत, तेच सत्यस्वरूपही आहेत. जेथे जेथे सत्य व शांती असेल, तेथे आनंदाचा अनुभव येतोच. असे झाले की मन प्रसन्न होते. अशा अफाट शक्‍तीच्या संपर्कात कोणी दुर्जन, नकारात्मक शक्‍ती असलेले आले तर ते भयभीत होतात, नष्ट होतात. ज्यांनी भगवंतांची आभा, प्रभाव जाणला आहे असे सिद्धगण भगवंतांना वारंवार नमस्कार करतात. आपली सिद्धी, आपली शक्‍ती, याच शक्‍तीतून आलेली आहे याची या सिद्धांना पुरेपूर कल्पना असते; आपली समृद्धी, आपली शांती, आपला आनंद ही त्यांचीच देणगी आहे या कल्पनेतून सिद्धगण त्यांना वारंवार नमस्कार करतात. भगवंतांशिवाय आपल्याला आनंद मिळणार नाही, शक्‍ती मिळणार नाही, त्यांच्याशिवाय जीवनच असू शकणार नाही.
भगवंतांनी रणांगणावर अर्जुनाला मार्गदर्शन करण्यासाठी श्रीमद्‌भगवद्‌गीता कथन केली. ती इतक्‍या काळानंतरही आपल्यालाही मार्गदर्शन करणारी आहे. त्यातील सात श्‍लोक आपल्या आयुष्यात पदोपदी मार्गदर्शक आहेत. त्यापैकी दोन श्‍लोकांचा आकळलेला अर्थ आपण याआधी पाहिला. येथे उर्वरित पाच श्‍लोक समजून घेऊ.
3) सर्वतः पाणिपादं तत्‌ सर्वतोऽक्षिशिरोमुखम्‌ ।
सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति ।।13-13।।

("तो' परमपुरुष परमात्मा सर्व बाजूंनी हात-पाय असलेला, सर्व बाजूंनी डोळे, डोकी व तोंडे असलेला, सर्वत्र कान असणारा आहे. कारण तो विश्वात सर्वांना व्यापून राहिलेला आहे.)
परमात्मा सर्वांचे कारणरूप असल्याने सर्व चराचराला व्यापून राहिला आहे. त्यांना हजारो कान आहेत, हजारो डोळे आहेत, त्यांची हजारो मुखे आहेत. तो सर्व जगाला व्यापून राहिलेला आहे. आपण कोणीही त्यांच्या या व्याप्तीतून बाहेर पडू शकत नाही. समुद्रात उतरले असता चारही बाजूंना समुद्र असतो, जगातील सर्व जण समुद्रात आले तरी समुद्र त्या सगळ्यांना सामावून घेतो. तसे वातावरणात असलेली भगवंतांची शक्‍ती एवढी प्रचंड आहे की आपण सर्व त्यात सामावले जातो, भगवंततत्त्व सगळ्यांना व्यापून राहिलेले आहे.
4) कविं पुराणम्‌ अनुशासितारम्‌ अणोरणियांसमनुस्मरेद्यः ।
सर्वस्य धातारमच्नित्यरूपम्‌ आदित्यवर्णं तमसः परस्तात्‌ ।।8-9।।

या श्‍लोकात आपल्याला काय करायचे आहे हे सांगितलेले आहे. येथे पुरुष शब्द हा लिंगवाचक नसून व्यक्‍ती असा आहे (संस्कृतमध्ये व्यक्‍ती असा अर्थ घेतला जातो).
परमात्मा हा सर्वज्ञ आहे, परमात्मा सर्व काही जाणतो; त्यांना आदि नाही, तसेच अंतही नाही, त्यामुळे त्यांचे ऐकावे लागतेच; तोच सगळ्या गोष्टींचा नियंता आहे, म्हणजे आपल्या सर्व दोऱ्या त्याच्याच हाती आहेत; तो छोट्याहून छोटा व मोठ्याहून मोठा आहे; तोच सर्वांचे धारण-पोषण करणारा आहे, त्यांचे स्पंदन आपल्यात प्राणरूपाने असतो, प्राण गेला तर सर्व संपून जाते; तो अचिंत्यस्वरूप आहे, म्हणजे आपण परमात्म्याच्या रूपाची कल्पना करू शकत नाही; तो सूर्याप्रमाणे नित्य चेतन आहे, म्हणजे या विश्वाच्या सुरवातीपासून सूर्य ज्याप्रमाणे बारा महिने, चोवीस तास प्रकाशत असतो, तसा परमात्मा सदैव प्राणस्पंदने देत असतो. तो अविद्येच्या पलीकडे आहे. अशा शुद्ध सच्चिदानंद परमघन परमात्म्याचे सदैव स्मरण करायला हवे. अशा परमात्म्याची लीला ध्यानात आली तर आपोआप हात जोडले जातात.
5) श्रीभगवानुवाच
ऊर्ध्वमूलमधःशाखम्‌ अश्वत्थं प्राहुरव्ययम्‌‌‌ ।
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्‌ ।।15-1।।

(आदिपुरुष परमेश्वराचे रूप हे मूळ असणाऱ्या ब्रह्मदेवरूपी मुख्य शाखा असणाऱ्या अशा अविनाशी वृक्षाला, ज्याची पाने वेद आहेत असे म्हणतात, त्या संसाररूपी वृक्षाला म्हणजेच त्या परमपुरुषाला जे तत्त्वतः जाणतात, तेच वेदांचे तात्पर्य जाणणारे आहेत असे समजतात.)
या श्‍लोकावरून आपल्याला बोध होतो, की आपल्याला वेदांचे तत्त्वतः अर्थ जाणायचे आहे. म्हणजे वेदांमधील श्‍लोकांचे वरवर दिसणारे अर्थ न घेता त्यांचे सांकेतिक अर्थ समजून घ्यायला हवे. हे समजून घेण्यासाठी आपल्या स्वतःच्या शरीरात डोकावून पाहणे आवश्‍यक होय. मेंदू हा ब्रह्म आहे व त्यापासून खाली जाणाऱ्या मेरुदंडातून असंख्य नाड्या जातात. अशा प्रकारे हा संसारवृक्ष आहे. झाडाची मुळे जमिनीतून अन्न-पाणी उचलतात, झाडाची मुळे जमिनीत असतात व झाड वर वाढते. या संसाररूपी वृक्षाला समजून घेण्यासाठी मेंदू हा संपूर्ण कार्यभाग चालवत असल्यामुळे त्या मेंदूपासून मेरुदंड खाली जात असल्यामुळे व त्याला येणारी सर्व इंद्रिये व अवयव आणि चालणारा व्यवहार ही त्या वृक्षाची वृद्धी समजल्यामुळे, जसे झाडाची मुळे जमिनीत असतात, तसे संसारवृक्षाची मुळे वर मेंदूत असतात, हे सांगण्याचा येथे प्रयत्न केलेला आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, वेदांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी शरीरातच अनुभवता येतात. या गोष्टी परमेश्वराला उद्देशून असल्या, तरी तो परमेश्वर प्रत्येक व्यक्‍तीच्या शरीरात राहून व्यक्‍तीचे कार्य चालवत असतो.
6) सर्वस्य चाहं हृद संनिविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च ।
वेदैश्‍च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्‌ ।।15-15।।

पूर्वीच्या श्‍लोकात सामान्यतः दिसणाऱ्या अश्वत्थ वृक्षाचे वर्णन नसून शरीरात असलेल्या वृक्षाबद्दल भगवंत सांगत आहेत. या शरीरात असलेल्या वृक्षाची मुळे वर आहेत व वृक्ष खाली फोफावतो असे सांगितले आहे. या श्‍लोकाला पुष्टी देण्यासाठी भगवंत म्हणत आहेत, मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी रूपाने स्थित आहे. हृदयाच्या आत स्पंदन होते व आकुंचन- प्रसरणामुळे सर्व शरीरभर रक्‍त पोचवले जाते व शरीराकडून रक्‍त हृदयाकडे खेचले जाते. प्रत्येक पेशीत असलेला न्यूक्‍लिअस, जो प्राणशक्‍ती स्पंदित करतो, ते हृदय म्हणायला हरकत नाही. हृदय ही एक संकल्पना आहे असे समजून घेतले तर परमेश्वर हृदयात आहे व तेथून स्पंदने निघतात हे लक्षात येते. पुढे भगवंत म्हणत आहेत, की माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान व अपोहनही होतात. मेंदू वरून सर्व शरीराचे पोषण करतो, तसेच स्मृती, ज्ञान व वेगवेगळ्या विचारांनी संशय घालविणे या क्रियाही मेंदूच करतो. सर्व वेदांच्या द्वारे जाणून घेण्यायोग्य काही असेल तर तो परमेश्वर व त्याचे रूपच आहे. वेदांताचा कर्ता परमेश्वर आहे व वेदांना जाणणाराही परमेश्वरच आहे. म्हणजे सरतेशेवटी सर्व विचार मेंदूतूनच निघतात, मेंदूनेच त्यांचे वर्गीकरण व चिंतन करायचे असते आणि निर्णयही मेंदूनेच घ्यायचा असतो. विशिष्ट अवयवांना चालविण्याचे कामही मेंदूच करत असतो. अशा तऱ्हेने परमेश्वराचे व्यक्‍तिगत अनुभवाचे रूप भगवंतांनी या ठिकाणी समजावलेले आहे व उफराट्या शरीरवृक्षाची कल्पना समजावली आहे.
7) मन्मना भव मद्भक्‍तो मद्याजी मां नमस्कुरू ।
मामेवैष्यसि युक्‍त्वैवम्‌ आत्मानं मत्परायणः ।।9-34।।

(केवळ मज वासुदेव परमात्म्याच्या ठिकाणी अनन्यप्रेमाने नित्य मन ठेवणारा हो; श्रद्धेने, निष्कामभावाने माझे नाम, गुण व प्रभाव यांचे श्रवण, कीर्तन, मनन, पठण करत मज परमेश्वराला निरंतर भजणारा हो; मन, वाणी व शरीराद्वारा सर्वस्व अर्पण करून श्रद्धा, भक्‍ती व प्रेम यांनी विव्हल होऊन पूजन करणारा हो; मज वासुदेवाला विनयभावपूर्वक व भक्‍तीसहित साष्टांग प्रणाम कर; मला प्रणाम कर. याप्रमाणे मला शरण होऊन राहणारा तू आत्म्याला माझ्यामध्ये योजून मलाच येऊन मिळशील.)
परमात्मा म्हणजे सकारात्मकता, परमात्मा म्हणजे सत्य, परमात्मा म्हणजे दया. यातच कायम श्रद्धा असावी. इतर कशाचाही विचार करू नये. परमेश्वराला निरंतर भजणारे व्हावे. मानवतेला बट्टा लावणारे, मुलांना बिघडवणारे, इतरांना चुकीच्या मार्गावर घेऊन जाणारे काही करू नये. केवळ भगवंतांवर श्रद्धा असावी. इतरांना मदत करणे हीच त्यांची खरी पूजा. समजा एखाद्या मुलाकडे फी भरायला पैसे नाहीत, तर त्याला चंदन लावून त्याची पूजा करण्याचा काय उपयोग? त्याला वह्या, पुस्तकांसाठी पैसे देणे, त्याच्या परीक्षेची फी भरणे हीच त्याची पूजा, हीच परमेश्वराची पूजा. परमेश्वराला लीनतापूर्वक प्रणाम करावा, अर्थात यासाठी खाली झुकावे लागेलच. असे सर्व करणारा स्वतः भगवंतस्वरूप होईल. भगवंत म्हणजे आनंद, परमानंद. हे सर्व करणारा परमानंदाला प्राप्त होईल, म्हणजेच परमेश्वरप्राप्ती होईल अशी ग्वाही स्वतः भगवंत देत आहेत.

No comments: